महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २४ मार्च – हवाई वाहतूक नियामक महासंचालकाने (DGCA extend Suspension of International Flights till 30th April 2021) मंगळवारी आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध आणखी एक महिना वाढवले. जवळपास एक वर्षाहून अधिक काळ देशातील आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित आहे. डीजीसीएने ३० एप्रिल २०२१ पर्यंत आंतरराष्ट्रीय विमान सेवा खंडीत केली आहे.
गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवरील निर्बंध वाढवण्यात आले होते. युरोपात करोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने आंतरराष्ट्रीय विमान सेवा ३० एप्रिल २०२१ पर्यंत स्थगित केल्यास डीजीसीएने ट्विटमध्ये म्हटलं आहे.निवडक देशांशी द्विपक्षीय करारांतर्गत आंतरराष्टीय विमान सेवा सुरु केली आहे. यात अमेरिका, ब्रिटन, यूएई, केनिया, भूतान, फ्रान्स यासह २७ देशांनी केलेल्या द्विपक्षीय करारानुसार सुरु असलेली विमान सेवा कायम राहील, असे डीजीसीएने स्पष्ट केले आहे. करोना रोखण्यासाठी लागू केलेल्या कठोर लॉकडाउनमुळे २३ मार्च २०२० पासून देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंदी घालण्यात आली होती. या काळात केवळ वंदे भारत मिशन अंतर्गत परदेशात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची विशेष विमान सेवा सुरु होती.
सुरुवातीच्या काळात एअर इंडिया आणि त्याची सहकारी एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर इतर विमान कंपन्यांना ही या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले. हवाई सुटकेबरोबरच नौदलाच्या जहाजांचा देखील भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यात उपयोग केला गेला.दरम्यान, केंद्र सरकारने विमान कंपन्यांना आणि विमानतळ हाताळणाऱ्या कंपन्यांना सोशल डिस्टंसिंगचे कडेकोट पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार बोर्डिंगपास काढताना तसेच प्रतिक्षालयातील आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तसेच विमानात देखील दोन आसनामध्ये एक आस रिक्त ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना करोनापासून संरक्षित करण्यासाठी तोंडावर मास्क, आवरण, हातमौजे अशा प्रकारच्या उपायोजना विमान कंपन्यांनी आणि विमानतळ प्राधिकरणाने केल्या आहेत.
सहा कोटी भारतीयांना मायदेशी आणले
नुकताच नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटद्वारे वंदे भारत मिशनची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे, की परदेशातील ६ कोटी ७५ लाख भारतीयांना आतापर्यंत मायदेशी आणले असून, ही संख्या सतत वाढतच आहे. ते म्हणाले, की ही फक्त जगभरात अडकलेल्या आणि त्रासात सापडलेल्या नागरिकांना आणण्यासाठी सुरू केलेली मोहीम नसून ती आशा आणि आनंदाची मोहीम आहे ज्यायोगे लोकांना समजले की त्यांना संकटकाळी मागे /एकटे टाकले जाणार नाही. ७ मे २०२० पासून भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी या जगातल्या सर्वात मोठ्या मोहीमेला आरंभ केला होता.