महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २४ – मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 3-2 ने विजय झाला. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दृष्टीने ही सीरिज अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) पाचही सामन्यांमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देऊन प्रयोग केले.
टी-20 वर्ल्ड कपला अजून 6 महिने बाकी असले, तरी टीम इंडियात सातव्या क्रमांकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळू शकते. या क्रमांकासाठी भारताकडे एक दोन नाही तर तब्बल 5 पर्याय उपलब्ध आहेत. गेल्या वर्षभरातला फॉर्म बघितला तर कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि आर.अश्विन या स्पर्धेत आहेत.
कृणाल पांड्या
सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी करून कृणाल पांड्याने (Krunal Pandya) भारताच्या वनडे टीममध्ये स्थान पटकावलं. यानंतर पहिल्याच वनडेमध्ये त्याने आक्रमक बॅटिंग करत अर्धशतकी खेळी केली. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजनंतर कृणाल आयपीएलमध्ये खेळेल. आयपीएलमध्येही त्याने हाच फॉर्म कायम ठेवला तर त्याची वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होऊ शकते.
रविंद्र जडेजा
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) टीमबाहेर आहे. पण त्याआधी जडेजाने भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती, त्यामुळे दुखापतीनंतर जडेजाचं टीममध्ये नक्कीच कमबॅक होईल.
अक्षर पटेल
रविंद्र जडेजाच्या दुखापतीमुळे अक्षर पटेलला (Axar Patel) इंग्लंडविरुद्ध संधी मिळाली. या संधीचं अक्षर पटेलनेही सोनं केलं. इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा विजय झाला, यात पटेलने बॉलिंगमध्ये मुख्य भूमिका बजावली, ज्यामुळे त्याची टी-20 टीममध्ये निवड झाली.
वॉशिंग्टन सुंदर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये संधी मिळाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) कमाल केली. ऑस्ट्रेलियातल्या टीम इंडियाच्या विजयात सुंदरने मोलाची कामगिरी केली. गेल्या काही काळापासून सुंदर भारताच्या टी-20 टीममध्येही आहे.