महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २७ मार्च -नवीदिल्ली – एकीकडे देशात कोरोनाचा धोका वाढत असताना दुसरीकडे यंदाची उष्णताही जीवघेणी ठरू शकते. संशोधकांच्या मते, यावर्षी भयंकर उन्हाळा (Summer) असेल आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये (South Asian countries) उष्माचा उद्रेक होईल. अमेरिकेतील (America) ओक रिज नॅशनल लॅबोरेटरीसह विविध संस्थांमधील (Oak Ridge National Laboratory) शास्त्रज्ञांनी संशोधनात दावा केला आहे, की यावेळी उन्हाळा अत्यंत भयंकर असेल. त्यामुळे, भारतातील अन्नधान्याचे मोठे उत्पादक असलेल्या भागांवरही याचा परिणाम होईल. कडक उन्हामुळे काम करण्यात अडचणी येतील. एवढंच नाही तर यावेळी भर उन्हात काम करणंही असुरक्षित ठरेल.
या संशोधनात सांगितलं गेलं आहे, की यंदा उष्णतेमुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये काम करणं अत्यंत कठीण असेल. यासोबतच कोलकाता, मुंबई आणि हैदराबाद यासारख्या शहरांमध्येही यंदा भयंकर उष्णता असणार आहे. याठिकाणी उष्णतेमुळे काम करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
या संशोधनात असा दावा केला गेला आहे, की दक्षिण आशियाई देशांमध्ये संकटं प्रत्येक वर्षी वाढत आहेत. अशात मोठ्या संकटांपासून वाचायचं असल्यास तापमानात होणारी वाढ रोखणं गरजेचं आहे. तापमान नियंत्रित केलं जाणार नाही तोपर्यंत अशी अनेक संकटं समोर येत राहातील. सध्याची परिस्थिती पाहाता दक्षिण आशियाई देशांना यासाठी आतापासून काम करणं गरजेचं आहे. या कामात उशिर अत्यंत धोकादायक सिद्ध होऊ शकतो.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आताच तापमान पाहाता वरील ठिकाणी तापमानात 1.5 अंश सेल्सिअस वाढ झाल्यासही हे अत्यंत गंभीर ठरू शकतं. सध्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वेगाने कमी करण्याची गरज आहे. जागतिक तापमानात 1.5 ते 2 अंश सेल्सिअस तापमान वाढल्यामुळे दक्षिण आशियात प्राणघातक उष्णता राहिल.