पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपनं दिला तगडा उमेदवार ; राष्ट्रवादीपुढे आव्हान;

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पंढरपूर । दि. २९ मार्च ।भारत भालके यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं अखेर आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. यापूर्वी याच मतदारसंघातून दोनदा निवडणूक लढताना प्रतिस्पर्धी उमेदवारांना कडवी टक्कर देणारे , समाधान अवताडे यांना भाजपनं रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभं राहिलं असून ते परतावून लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला मैदानात उतरवणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. (Samadhan Awatade To Fight Pandharpur Mangalwedha bypoll From BJP)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. मात्र, भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या असा आग्रह कार्यकर्त्यातून वाढत चालला आहे. त्यामुळं पक्षासमोरचा पेच वाढला आहे. शरद पवार हे तासगाव पॅटर्न प्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादीचा उमेदवार पाहून उमेदवार द्यायचा, अशी भाजपची रणनीती होती. मात्र, राष्ट्रवादीनं अद्याप उमेदवार जाहीर न केल्यानं भाजपनं आपले पत्ते उघड केले आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर विधानसभेची ही पहिलीच पोटनिवडणूक असल्यानं सत्ताधारी व विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. सध्या या मतदारसंघात शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शैला गोडसे यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सचिन पाटील यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजपनं पंढरपूरमध्ये प्रभावी असलेल्या परिचारक गटाची मनधरणी करून समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे.

समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायिक असून सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांपासून ते भाजपचं काम करत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष आहेत. याशिवाय ते सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक असून सोलापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. अवताडे यांनी २०१४ साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर, २०१९ ला ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी लक्षणीय मते घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *