महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । निखिल गाडे । दि.२५ एप्रिल। मुंबई । आजची एक लढत ही भारताच्या आजी-माजी कर्णधारांमध्ये होणार असल्यामुळे क्रीडा रसिकांसाठी हा सामना मेजवानीच ठरणार आहे! धोनीब्रिगेड CSK आज विराटसेना RCB ला काँटे की टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. एकीकडे सलग तीन विजय मिळवत चेन्नईनं आपल्या आयपीएल प्रवासाचा शंखनाद केला आहे. तर रॉयल चॅलेंजर्सनी इतिहासात पहिल्यांदाच पहिले चारही सामने जिंकत यंदा काहीतरी वेगळं घडणार असल्याचा बिगुल वाजवला आहे!
गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या आरसीबी आणि सीएसके यांच्यातल्या लढतींमधले याआधीचे आकडे पाहिले, तर धोनी ब्रिगेड त्यात अव्वल असल्याचं दिसत आहे. आयपीएलमध्ये या दोन्ही संघांनी खेळलेल्या गेल्या १० लढतींमध्ये एकूण ८ लढती CSK नं जिंकल्या आहेत. त्यामुळे आयपीएलचा इतिहास धोनीच्या बाजूने असला, तरी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सुरुवातीचे चार सलग सामने जिंकून यंदा कर्णधार विराट कोहली इतिहास घडवण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत दोघांमध्ये झालेल्या एकूण २७ सामन्यांचा विचार केला, तर RCB नं त्यातले फक्त ९ सामने जिंकले असून धोनी ब्रिगेडनं तब्बल १७ सामन्यांमध्ये वर्चस्व गाजवलं आहे.
मुंबईच्या वानखेडेचा विचार करता या ठिकाणी यंदाच्या आयपीएलच्या हंगामात झालेल्या ८ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे या दोन्ही कर्णधारांसाठी आजच्या सामन्यामध्ये टॉस जिंकणं महत्त्वाचं ठरणार आहे. टॉसवर पुढची बरीच गणितं अवलंबून असतील.
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या गेल्या लढतीत २२० धावा करूनही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे एकवेळ चेन्नई पराभूत होण्याची चिन्हे दिसत होती. दीपक चहर सातत्याने ‘पॉवरप्ले’च्या षटकात प्रभावी मारा करत आहे. मात्र शार्दूल ठाकूर, सॅम करनसह अन्य गोलंदाजांनी कामगिरी उंचावण्याची गरज आहे. ऋतुराज गायकवाड आणि फॅफ ड्यूप्लेसिस या जोडीकडून चेन्नईला पुन्हा एकदा दमदार सलामीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत सुरेश रैना, मोईन अली आणि रवींद्र जडेजा या डावखुऱ्या त्रिकुटाने पुन्हा एकदा मोलाचे योगदान दिल्यास चेन्नईला सलग चौथा विजय मिळवता येईल.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातील शतकवीर देवदत्त पडिक्कल, कर्णधार कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स या एकापेक्षाएक चार फलंदाजांपासून चेन्नईला सावध राहावे लागणार आहे. धोनीविरुद्ध कोहलीच्या नेतृत्वाकडेही या लढतीदरम्यान सर्वांचे लक्ष असेल. हंगामात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असलेला हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज वेगवान माऱ्याची धुरा भिस्त प्रभावीपणे सांभाळत आहेत. मात्र बेंगळूरुचे विजयी पंचक साकारण्यासाठी यजुर्वेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंनी योगदान देणे गरजेचे आहे.