महाराष्ट्र २४ , नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे ७ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या ‘ऑटो एक्स्पो’वर मंदीचे सावट आहे. गेल्या वर्षभरापासून देशातील वाहन विक्रीत घसरण झाल्याने वाहन उत्पादकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यंदा अनेक कंपन्यांनी ‘ऑटो एक्स्पो’तून माघार घेतली आहे.
वाहन बाजारपेठेला चालना देणारा द्वैवार्षिक मेळावा म्हणून भारतातील ‘ऑटो एक्स्पो’ जगभरातील वाहन उत्पादकांना खुणावत असतो. यंदा मात्र भारतातील वाहन उद्योगाची मंदीने अवस्था बिकट केली आहे. सर्वच श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत मागील वर्षभर घसरण होत आहे. अनेक बड्या कंपन्यांनी उत्पादनात कपात केली आहे. काहींनी कर्मचारी कपात केली. मंदीची सर्वात मोठी झळ सुटे भाग उत्पादकांना बसली आहे.
‘ऑटो एक्स्पो’ २०१८ मध्ये ८० वाहने सादर करण्यात आली होती. यंदा त्यात आणखी घट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. २०१९ मध्ये भारतातील वाहन विक्रीत १३.७७ टक्क्यांची घसरण झाली. गेल्या २० वर्षातील ही सुमार कामिगरी ठरली. गेल्या वर्षभरात प्रवासी वाहनांच्या विक्रीत १२.७५ टक्के, दुचाकींच्या विक्रीत १४.१९ टक्के आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत १५ टक्के घसरण झाली. त्यामुळे वाहन उत्पादक धास्तावले आहेत. केंद्र सरकार आणि ‘सियाम’कडून ‘ऑटो एक्स्पोला यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती ‘सियाम’चे महासंचालक सुगातो सेन यांनी दिली. ‘ऑडी, बीएमडब्ल्यू इंडिया, जग्वार लॅंडरोव्हर यासारख्या कंपन्या यंदा ‘ऑटो एक्स्पोत सहभागी होणार नाहीत