महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. १३ मे ।मान्सूनने वर्दी देण्याच्या आधीच देशातील अनेक भागांत विक्रमी पाऊस कोसळत आहे. हवामान संस्थांनुसार, देशात हवामानाच्या ५ ‘सिस्टिम’ विकसित झाल्यामुळे पाऊस पडत आहे. देशाच्या उत्तर आणि उत्तर-पश्चिम भागांत पश्चिम विक्षोभ सक्रिय आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशसारख्या डोंगराळ भागांत पाऊस पडत आहे.
पंजाबवर चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र विकसित झाले आहे. येथून पश्चिम बंगाल आणि सिक्कीमपर्यंत ढगांची एक रेषा तयार झाली आहे. हवामान तज्ज्ञांनुसार, उत्तर-पश्चिम भारतात अरबकडून येणारे वारे पूर्वेच्या वाऱ्यांना धडकत आहेत. यामुळे पुढील २- ३ दिवस पंजाब, हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेशात गडगडाटासह पाऊस पडेल.
पश्चिम बंगाल, बिहार व झारखंडच्या पूर्व भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. मध्य उत्तर प्रदेश ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे. कर्नाटक ते केरळपर्यंत एक टर्फलाइन तयार झाली आहे. कोमोरिन भागात चक्रीय वाऱ्यांचे क्षेत्र तयार झाले आहे.चक्रीय वादळाचे क्षेत्र लक्षद्वीपकडे : हिंद महासागर व अरबी समुद्रात विकसित झालेले चक्रीय वाऱ्यांचा पट्टा दाट होत असून तो लक्षद्वीपकडे जात आहे. १६ मेपर्यंत तो सागरी चक्रीवादळ ‘ताऊ ते’ मध्ये रूपांतरित होऊ शकतो.
बुधवारी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये १५६ मिमी पाऊस पडला. हा गेल्या दशकभराचा विक्रम आहे. कोलकाताच्या अलीपूर स्टेशनवर १०२ मिमी व साॅल्टलेक सिटी स्टेशनवर १२१ मिमी पाऊस झाला. हाही दशकभरातील दुसरा उच्चांक आहे.