महाराष्ट्र २४, मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नेमकी कधी साजरी करायची, यावरून महाविकासआघाडीत सुरु असलेला गोंधळ आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा सुवर्णमध्ये निघाल्याचे समजते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे तारखेनुसार म्हणजे १९ फेब्रुवारीला येणाऱ्या शिवजयंतीवेळी शासनातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. तर शिवसेना पक्ष पूर्वीप्रमाणेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करेल.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडीचे सरकार स्थापन केले होते. त्यामुळे हे सरकार आता नेमक्या कोणत्या तारखेला शिवजयंती साजरी करणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करण्यात येते. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तारखेनुसार जयंती साजरी करण्यात येते. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचाही प्रयत्न केला होता.