महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जून । उस्मानाबाद । दूध खरेदी दरात मोठी घसरण झाल्याने उत्पादक मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच पेरणीचे दिवस तोंडावर आहेत. शिवाय मशागतीचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे देवधानोरा भागातील शेतकरी कवडीमोल किमतीत पशुधन विकून बी- बियाणे खरेदी करताना दिसत आहेत.
देवधानोरा, गोविंदपूर, बोरगाव (बु), नागुलगाव, गौरगाव, हासेगाव (शि), एकुरका, जवळा खुर्द, बोरवंटी, भाटशिरपुरासह परिसरातील पशू पालक शेतकरी दुधाला कमी भाव मिळत असल्याने हैराण झाले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाऊन पूर्वी दुधाचे दर समाधानकारक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवून दुग्ध व्यवसायाचा मार्ग निवडला. परंतु, अचानक टाळेबंदी लागू झाल्याने दुधाचे भाव गडगडले. यातच पशुखाद्याचे भाव मात्र तेजीत आहेत. पशुसंवर्धन करण्यासाठी लागणारा चारा चढ्या भावाने मिळत आहे. तर दुधाच्या पैशातून पेंड आणि भुसा हे पशुखाद्य घेणेसुद्धा अवघड झाल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
खरेदी ४० तर विक्री ५० रुपये
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून पूर्वी ४८ ते ५० रुपये लिटर प्रमाणे म्हशीचे दूध खरेदी केले जात होते. आता हेच दूध ४० ते ४५ रुपये लिटर प्रमाणे खरेदी करून त्याची विक्री ५० रुपयांप्रमाणे केली जात आहे. तर गाईच्या दुधाला केवळ २३ रुपये दर मिळत आहेत. यात शेतकऱ्यांनी कष्ट घेऊनही त्यांच्या हाती काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.