महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ जुलै । दहावीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर आणि टक्केवारीने विद्यार्थी पास झाल्याने अकरावी आणि आयटीआय प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी उत्सुक असल्याने प्रवेशासाठी मोठी शर्यत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यंदा अकरावी प्रवेशासाठीच्या शर्यतीला सीईटीचा ब्रेक लागणार आहे. अकरावी प्रवेश हे सीईटीच्या आधारे करण्याचे शालेय शिक्षण विभागाने या आधीच जाहीर केले आहे.
सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असून सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित रिक्त जागांवर दहावीतील गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेश मिळणार आहे. यंदा मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून तब्बल 15 हजार 540 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण असून 90 ते 85 टक्क्यांमध्ये 21 हजार 992 आणि 80 ते 85 टक्क्यांदरम्यान 32 हजार 294 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना सीईटीतदेखील उत्तम गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एसएससीबरोबरच सीबीएसई आणि आयासीएसई बोर्डाचे विद्यार्थीही प्रवेशासाच्या शर्यतीत असून या विद्यार्थ्यांनाही सीईटीच्या आधारेच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरविले जाणार आहे.