Maharashtra HSC Result 2021 : बारावी निकालाची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० जुलै । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना 31 जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार महाराष्ट्र स्टेट एज्युकेशन बोर्डाकडे आज आणि उद्याचा दिवस आहे. त्यामुळे आज बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करुन उद्या निकाल लागण्याची जास्त शक्यता आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा परिणाम दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर झाला आहे. दहावीचा निकाल या आधीच लागला असून आता बारावीचा निकाल पेंडिंग आहे. गेल्या महिन्यात, 24 जूनला सर्वोच्च न्यायालयाने सीबीएससी, सीआयसीएसई आणि देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना बारावीच्या परीक्षांचा निकाल 31 जुलैपूर्वी लावण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे आता दोनच दिवसांची मुदत राहिली आहे.

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बारावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरले जाणार असून त्यासाठी 30:30:40 असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. यामध्ये दहावीच्या गुणांचे 30, अकरावीच्या गुणांचे 30 आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे 40 टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

राज्यात गेल्या आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शिक्षकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत होत्या. मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होण्याचे प्रकार, वाहतुकीची साधने नसल्यामुळे, वाहतुकीची कोंडी व वाहतूक अत्यंत मंदगतीने चालत असल्याने शिक्षक शाळा महाविद्यालयात पोचू शकत नाहीत परिणामी निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *