महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । राज्यात मागील चार ते पाच दिवस चांगला पाऊस पडला. राज्याच्या अनेक भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांना जीवदान मिळालं. मात्र आता पुढचे पाच दिवस पाऊस दडी मारेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देईल, असा अंदाज आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाला पुन्हा सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
आज महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस बरल्यानंतर आता पुन्हा पाऊस दडी मारण्याची चिन्हे आहेत. मागील चार ते पाच दिवस राज्याच्या काही ठिकाणी चांगला पाऊस झाला, मात्र काही शहरं आणखीही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. या शहरांना आणखी पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
पाऊस दडी मारण्याची शक्यता असल्याने आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. मात्र जिथे हलक्या पावसाचा अंदाज आहे, त्या भागांत ढगाळ वातावरण राहिल. परंतु आठवडाभर चांगलं कमबॅक केलेला पाऊस आता चार ते पाच दिवसांसाठी ब्रेक घेणार, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलाय.
राज्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. पुढचे काही दिवस पाऊस असेल पण पावसाचे प्रमाण कमी असेल. पाऊस पडले पण हलका ते मध्यम स्वरुपाचा असेल. पाऊस नसण्याची परिस्थिती सर्वसाधारण दहा दिवस असेल, असं भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के एस होसाळीकर यांनी सांगितले.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसारपुढील पाच दिवस पावसाची शक्यता नाही. इशारे, अंदाज नाहीत म्हणजे मान्सून सक्रिय नाही. पुढील काही दिवस अशीच प्रकारची परिस्थिती राहिल, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाचं पुन्हा आगमन होईल, असं होसाळीकर यांनी म्हटलं आहे.