महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 29 ऑगस्ट । शहरातील सरकारी लसीकरण केंद्रात लसमात्रांचा तुटवडा आहे. याउलट खासगी लसीकरण केंद्रावर मुबलक साठा उपलब्ध असून त्यासाठी ७०० रुपयांपासून ते १२०० रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. लसवाटपातील या गोंधळामुळे नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून गणपती विशेष रेल्वे आणि एसटीचे आरक्षण सुरू आहे. त्यावेळी कोणतेही नियम नव्हते. आता ते आरक्षण रद्द करायचे झाल्यास १०० ते ५०० रुपये भुर्दंड होणार आहे. ‘आधीच नोकऱ्या नाहीत, रेल्वेप्रवास सुकर नाही. असे असताना सरकारच्या गोंधळाचा भुर्दंड नागरिकांनी का सहन करायचा? सरकारी मोफत लस उपलब्ध नाही, मात्र खासगी केंद्रात लस आहे. महामारीत सरकारने मदत करणे अपेक्षित असताना येथे सरकारच सामान्यांकडून पैसे घेत आहेत,’ असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या एकूण १७५ रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यापैकी ६३ गाड्यांचे आरक्षण रविवारपासून सुरू होणार आहे. उर्वरित गाड्यांचे सरासरी आरक्षण ६० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या गाड्यांनाही चांगला प्रतिसाद आहे. जवळपास ६० हजार प्रवाशांनी एसटी गाड्यांचेही आरक्षण केले आहे.