महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय (Monsoon Active in Maharashtra) होतं आहे. सध्या छत्तीसगड परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे. पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy Rainfall) पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून (IMD alerts) वर्तवण्यात आली आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज भारतीय हवामान खात्याकडून, मुंबई, ठाणे, पुण्यासह संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याठिकाणी वेगवान वाऱ्याच्या साथीनं जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांना आज हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर इतर अनेक जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील तीन दिवस राज्यात हीच स्थिती कायम राहणार आहे. पण उद्या मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक रायगड या जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. तर विदर्भात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या नाशिक, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे.
31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या दोन दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यात साधारण 64 मिमी ते 200 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे.