गणेशोत्सवात गर्दी केल्यास कडक निर्बंध लावण्यात येणार; अजित पवार यांचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ सप्टेंबर । गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही. परंतु, लोकांनी खबरदारी न घेता गणेशोत्सवात गर्दी केल्यास दुसऱ्या दिवसांपासूनच कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणे शहराचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असला तरी ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्हिटी दर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा धोका कमी झाला नसून सणासुदीला गर्दी करून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका.

‘दहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, हे जनतेचं दुर्दैव आहे,’ अशी टीका अजित पवारा यांनी यावेळी केली. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. तो नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मोदी सरकारने दिलेले हे ‘अच्छे दिन’ आहेत,’ असे पवार म्हणाले.

‘काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन करीत आहेत, पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आणला जात आहे. केंद्र सरकारनेच सांगितले की, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत?”
– अजित पवार

‘कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. पर्यटनस्थळावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा,” असा आदेश अजित पवार यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *