महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील पाच दिवस ‘कृपावृष्टी’ होणार आहे. मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापुरात ‘ऑरेंज अॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे तर मुंबई, ठाणे, वर्धा, पालघर आणि सिंधुदुर्ग जिह्यांना ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला आहे. कोकणामध्ये एनडीआरएफचे पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात विकसित होणारे कमी दाबाचे क्षेत्र पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भागात सरकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राच्या ईशान्येपासून गुजरात किनारपट्टीपर्यंत पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने आजपासून कोकणपट्टय़ात पावसाचा जोर वाढेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अधिक सरी बरसण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
13 सप्टेंबरला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.
गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी गेले आहेत. अनेक चाकरमान्यांनी पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर मुंबईत परतण्याची तयारी केली आहे. पावसामुळे त्यांना त्यांचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागू शकतो.