महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ सप्टेंबर । गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची गर्दी वाढल्याने वर्दळीचे छत्रपती शिवाजी महाराज रस्ता व बाजीराव रस्ता रविवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. याच पद्धतीने सोमवारीही गर्दी पाहून आवश्यकतेनुसार, दोन्ही रस्ते तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी झालेल्या गर्दीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे वाहतूक शाखेने शिवाजी रस्ता व बाजीराव रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तो रात्री आठनंतर वाहतुकीसाठी पूर्ववत केला.
गणेशोत्सवातील गर्दी पाहून आवश्यकतेनुसार व तात्पुरत्या स्वरूपात शिवाजी व बाजीराव रस्ता सोमवारीही वाहतुकीसाठी बंद ठेवला जाईल. गर्दी कमी झाल्यास त्यानुसार रस्ते मोकळे करून वाहतूक सुरळीत केली जाईल.
– राहुल श्रीरामे,
पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा