महाराष्ट्र 24 -मुंबई
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 21 लाख 82 हजार शेतकर्यांची दुसरी यादी शनिवारी सहकार विभागाने प्रसिद्ध केली. या यादीतील शेतकर्यांनाही व्यवस्थित लाभ मिळेल आणि त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या तत्काळ सोडविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आतापर्यंत 1 लाख 10 हजारांपेक्षा जास्त शेतकर्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. सोमवारपासून त्यांच्या खात्यांवर पैसे जमा होतील, अशी माहिती सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी दिली. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पहिली प्रायोगिक तत्त्वावरील यादी 24 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यात 658 गावांतील 15 हजार 358 कर्ज खाती जाहीर करण्यात आली होती. राज्यातील 15 जिल्ह्यांत पूर्णत: याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू झालेल्या सहा जिल्ह्यांत याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. 13 जिल्ह्यांत अंशतः याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
प्रमाणीकरणानंतर संबंधित शेतकर्यांच्या कर्ज खात्यांवर व्यापारी बँका 24 तासांमध्ये, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांत 72 तासांमध्ये रक्कम जमा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एप्रिलअखेरीस कर्जमाफी योजनेची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे आधीच जाहीर केले आहे.