RO RO Ferry : येवा कोकण आपलोच असा! मुंबई–विजयदुर्ग रो-रो फेरीने ६ तासांत सागरी सफर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ मार्च २०२६ ।। दि. १ मार्च २०२६ रोजी कोकणवासीयांसाठी मोठी आनंदवार्ता ठरलेली मुंबई–विजयदुर्ग रो-रो (एम-टू-एम रो-पॅक्स) सेवा अधिकृतपणे सुरू झाली. मुंबई ते विजयदुर्ग दरम्यानची ही सागरी जलवाहतूक सेवा अवघ्या ६ ते ७ तासांत प्रवास घडवून आणणार आहे. रस्त्यांवरील वाहतूककोंडी, खड्डे आणि रेल्वेवरील वाढती गर्दी यांना पर्याय म्हणून या सेवेची प्रतीक्षा होती. होळीच्या पूर्वसंध्येला सुरू झालेल्या या उपक्रमामुळे कोकण–मुंबई सागरी दळणवळणात नवा अध्याय लिहिला गेला आहे. जलद, आरामदायी आणि तुलनेने कमी ताणाचा प्रवास हा या सेवेचा मुख्य लाभ ठरणार आहे.

या सेवेच्या शुभारंभाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा देत स्वागत केले आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला. आज सकाळी आठ वाजता नितेश राणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. एम-टू-एम रो-पॅक्स फेरीमुळे वाहनांसह प्रवास करणे शक्य होणार असल्याने पर्यटक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सागरी मार्गाने थेट सिंधुदुर्ग गाठण्याचा हा वेगवान पर्याय ठरणार आहे.

कोकण आणि मुंबईदरम्यानची ही सेवा ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्ते प्रवासातील १२ ते १४ तासांचा कालावधी आता निम्म्यावर येणार असल्याने वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे. सागरी वाहतुकीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. “ना वाहतूककोंडी, ना खराब रस्ते” असा संदेश देत सुरू झालेली ही रो-रो फेरी कोकणवासीयांसाठी नव्या प्रवासयुगाची सुरुवात ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *