महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) टीम इंडियाची घोषणा झाली आहे. मात्र आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) काही खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधलं आहे. वर्ल्ड कपसाठी टीम अंतिम करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी आज (13 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट टीमची जर्सी लॉन्च होणार आहे. त्यावेळी टीम इंडियातील नव्या खेळाडूंची घोषणा केली जाईल, अशीही चर्चा आहे. 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा सुरू होणार असून टीम इंडियाची पहिली लढत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
‘स्पोर्ट्स तक’च्या वृत्तानुसार 13 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची नव्यानं घोषणा केली जाऊ शकते. टीममध्ये जास्तीत जास्त 22 खेळाडूंचा समावेश करण्याची परवानगी आहे. उमरान मलिक, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यर यांचा टीममध्ये समावेश झाल्याच वृत्त यापूर्वीच आलं आहे. चौथा खेळाडू म्हणून आरसीबीचा फास्ट बॉलर हर्षल पटेलचं (Harshal Patel) नाव आघाडीवर आहे. त्या या आयपीएलमध्ये सर्वात जास्त 32 विकेट्स घेतल्या आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बॅट्समन म्हणून खेळण्याची शक्यता आहे, कारण त्याच्या फिटनेसवर अजूनही प्रश्न आहेत. आयपीएलमध्येही पांड्याने बॉलिंग केली नाही. केकेआरचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यरने या मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली. 8 सामन्यांमध्ये 38 च्या सरासरीने त्याने 265 रन केले, यात दोन अर्धशतकं आहेत. अय्यरचा स्ट्राईक रेटही 123 चा आहे, याशिवाय त्याने 3 विकेटही घेतल्या आहेत. हार्दिकचा बॅकअप म्हणून अय्यर टीममध्ये असेल.
निवड समितीने आवेश खानलाही टीमसोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो नेट बॉलर म्हणून टीमसोबत असेल. पण टीम मॅनेजमेंटला वाटलं तर ते आवेशचा मुख्य खेळाडू म्हणून टीममध्ये समावेश करू शकतात. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सदस्य असलेल्या आवेशनं या आयपीएल सिझनमध्ये आत्तापर्यंत 23 विकेट्स घेतल्या आहेत.
भारतीय टीम: विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर. अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर