परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबई, पुण्यात 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यावर पुनर्विचार ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत विचार होत आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसेच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई आणि पुणे येथे ओमायक्रोनचे रुग्ण सापडल्याने या शहरातील शाळा सुरू होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली. शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष आहे. आतापर्यंत अनेकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी स्थानिका जिल्हा आणि पालिका प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. आताही शाळा सुरू करायची की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनालाच दिले आहेत. येणाऱया काळातील परिस्थिती लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणतीही माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली नाही. मात्र लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा याला प्राथमिकता आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचे मतही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *