महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । एसटी महामंडळाच्या राज्यभरातील 250 पैकी 105 आगारांतील वाहतुकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला तसेच शालेय विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. एसटी महामंडळाच्या संपामध्ये काही दिवसांपूर्वी सर्वच्या सर्व अडीचशे आगारांची वाहतूक ठप्प झाली होती. रविवारी 734 बसेसच्या 1703 फेऱ्यांद्वारे 1 लाख 04 हजार 800 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली आहे.
एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच कॉलेज व शाळकरी मुलांचे होणारे हाल लक्षात घेत परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ऍड. अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्याने 4 डिसेंबर रोजी 67 आगारांतील वाहतूक सुरू झाली होती. त्यात वाढ होत आज राज्यातील 105 आगारांतील वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला संप अजूनही संपला नसला तरी आज सोमवारी 18,888 कर्मचारी डय़ुटीवर हजर झाले आहेत. तसेच शंभर आगारांतील वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे. तरीही कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांना संपात सहभागी कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. अशा अडवणूक करणाऱ्या कामगारांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल तसेच कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल, असे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी म्हटले होते. लातूर आगारात बस अडवणूक करणाऱ्या 14 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आहे.