![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | मंगेश खंडाळे | दि. ६ फेब्रुवारी २०२६ | | राज्यातील महामार्ग सध्या प्रवासासाठी नाही, तर संयम तपासण्यासाठीच खुले असल्यासारखे वाटत आहेत. सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा—आणि प्रवाशांच्या नशिबी पुन्हा एकदा हॉर्न, धूर आणि प्रतीक्षा. आज सकाळपासून येवल्याजवळील पुणे–इंदूर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रवाशांचा संयम सुटण्याच्या टप्प्यावर आहे. विंचूर चौफुली आणि फत्तेबुरूज नाका परिसरात तर वाहनं चालण्यापेक्षा उभीच अधिक दिसत आहेत. कामावर जाणारे कर्मचारी, बसमधील प्रवासी, मालवाहतूक करणारे ट्रकचालक—सगळेच एकाच प्रश्नात अडकले आहेत : “आज सुटेल का?”
खरं पाहिलं तर हा प्रकार आजचा नाही. परवा मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ टँकर उलटला आणि तब्बल ३२ तास वाहतुकीचा श्वास रोखला गेला. काल कोल्हापूरजवळ पुणे–बंगळुरू महामार्गावर कोंडी झाली आणि आज येवल्यात तोच खेळ. महामार्गावर अपघात, बिघडलेली वाहने, बंद पडलेले कंटेनर आणि त्यावर उपाययोजनांचा वेग मात्र कासवगती. टँकर हटवला, धोका टळला, असं सांगण्यात आलं; पण वाहतूक अजूनही पूर्वपदावर यायला तयार नाही. एक वाहन बाजूला झालं की दुसरं मध्येच थांबतं, आणि महामार्ग पुन्हा पार्किंगमध्ये बदलतो. प्रवाशांसाठी प्रवास म्हणजे वेळेचा अपव्यय आणि मानसिक थकवा झाला आहे.
या सगळ्यात प्रश्न उभा राहतो—महामार्ग आहेत की रोजच्या रोज उभ्या राहणाऱ्या अडचणींची प्रदर्शनं? अपघात होतात, हे मान्य; पण त्यानंतरची व्यवस्थापन यंत्रणा इतकी संथ का? पर्यायी मार्गांची माहिती वेळेत का दिली जात नाही? वाहतूक नियंत्रणासाठी तातडीचे निर्णय का घेतले जात नाहीत? राज्यातील प्रमुख मार्गांवर वारंवार होणाऱ्या कोंडीमुळे अर्थकारणावरही परिणाम होतो, पण त्याहून मोठा फटका सामान्य माणसाच्या वेळेला आणि संयमाला बसतो. महामार्ग वेगासाठी असतात, प्रतीक्षेसाठी नाही—हे कुणीतरी आठवण करून देण्याची वेळ आली आहे. नाहीतर उद्या चौथा दिवस, चौथा महामार्ग, आणि तीच जुनी कथा… वाहनं रांगेत आणि माणसं वैतागात.