महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणा (NHAI)ची कमाई वाढली असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं की, सध्या प्राधिकरणाला 40,000 कोटी रुपये मिळत आहेत, मात्र येत्या 3 ते 4 वर्षात ही कमाई वाढवून 1.40 लाख कोटी करण्याचं लक्ष्य आहे, असं गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी म्हटलं की, कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी त्या देशाची आर्थिक प्रगती होणं अत्यंत महत्वाचं असतं. यासाठी सरकारचा पहिला अजेंडा देशाला आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवण्याचा आहे. त्यांनी म्हटलं की, कोणताही देश त्याचवेळी आर्थिक दृष्टीनं समृद्ध होतो ज्यावेळी सरकार त्या देशाची ग्रामीण आणि आदिवासी लोकसंख्या अधिक असलेल्या क्षेत्राच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करत असते. यामुळं देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचणं गरजेचं आहे. त्या घटकांतील लोकांचं कॅपिटल इन्कम वाढवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. यामुळं देशाचा जीडीपी वाढेल आणि भारत आत्मनिर्भर होईल, असंही गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, यूपीतील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांप्रमाणे करु. आपल्याला यासाठी योगी सरकार पुन्हा सत्तेत आणावं लागेल. आम्ही जी आश्वासनं देतो ती पूर्ण करतोच, असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी आयोजित एका कार्यक्रमात गडकरी म्हणाले होते की, येत्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईकची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या किमती एवढी होईल. येत्या काळात आम्ही सर्वसामान्य लोकांना पर्यायी इंधन वापरण्याचा पर्याय देत आहोत. येत्या काळात नवीन गाड्याची किंमत 35 टक्क्यांनी कमी होईल, असंही ते म्हणाले होते.