Maharashtra Coronavirus: राज्यातील करोना निर्बंध कधी हटणार, शाळा कधी सुरु होणार? राजेश टोपेंचं महत्त्वाचं वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ जानेवारी । करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्यास फेब्रुवारी महिन्यात राज्यातील करोना निर्बंध शिथील केले जातील, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यात करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. परंतु, गेल्या-दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत फारशी वाढ झालेली नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील निर्बंध पुन्हा शिथील होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सध्या महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. याशिवाय, कार्यालये आणि अनेक व्यवसाय ५० टक्के क्षमतेने चालवण्याचे निर्देश दिले आहेत.

सध्या राज्यात करोना लशींचा दोन ते तीन दिवस पुरेल, इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे आगामी काळात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत राज्याला ४० लाख कोव्हॅक्सिन आणि ५० लाख कोव्हिशिल्ड लसींचा साठा देण्याची मागणी करतील. यापूर्वी ३ जानेवारीला केंद्र सरकारने महाराष्ट्राला १० लाख लसींचा साठा दिला होता.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून सावध राहण्याच्या सूचना

सध्या राज्यातील करोना रुग्णांचा आकडा कमी असला तरी बेसावध राहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केल्याचे समजते. करोना रुग्णांची संख्या वाढल्यास सर्व सुविधा तयार ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *