![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ जानेवारी । पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात (Lonavala) लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत. सोमवारी 17 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. शिवाय ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल आणि त्यांची मुदत ओलांडली असेल तर नाक्यावरच त्या व्यक्तीस लस टोचली जाणार आहे.
वडगाव मावळ तालुक्यातील लोणावळ्यासह कामशेत, कान्हे रेल्वे गेट, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉइंटवर ही अशीच नाकाबंदी करण्यात येणार आहे. दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत, त्यामुळेच ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे पार गेली आहे.
कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने तालुका प्रांताधिकाऱ्यांनी अशी खबरदारीची पावलं उचलली आहेत. एन्ट्री पॉइंटच्या प्रत्येक चेकपोस्टवर नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीला पोलीस ही तैनात असतील. ते प्रत्येक व्यक्तीला चेक पोस्टवर रोखणार आहेत.
त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतलेत का? एकच डोस घेतलाय आणि त्यांची दुसऱ्या डोसची मुदत संपलीये का? किंवा आत्तापर्यंत लसच घेतली नाही याची पडताळणी केली जाईल. शिवाय लस न घेतलेल्यांना चेक पोस्टवरच लस टोचण्यात येणार आहे.