महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१८ जानेवारी । कामगार न्यायालयाने एसटी कामगारांचा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मात्र आम्ही विलीनीकरणाशिवाय माघार घेणार नाहीच अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. राज्यातील विविध भागातील एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन सुरूच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विलीनीकरणाची प्रक्रिया वेळखाऊ असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा न्यायालयात लढा सुरू आहे. कामगार न्यायालयाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. मात्र उच्च न्यायालयात आम्हाला नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही आझाद मैदानातच राहणार आहोत.
कामगार न्यायालयाने संप बेकादा ठरवल्याने एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर पाठबळ मिळाले आहे. संप बेकायदा ठरल्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयात जाऊन कारवाया रद्द करून घ्यायच्या असतील तर त्याला अडचणी येतील, महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.