सूर्याने आग ओकायला केली सुरुवात; विदर्भात पारा 35 अंशावर, जाणून घ्या पुण्यातील हवामान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । गेल्या आठवड्यात पुण्यासह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा (Temperature in Maharashtra) वाढला होता. दरम्यान पुण्यात बऱ्याच दिवसांनी किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या पार गेला होता. त्यानंतर गेल्या दोन दिवसात पुण्यासह उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील तापमानात 2 ते 3 अंशाची घट नोंदली होती. पण आज पुन्हा पुण्यात उन्हाचा चटका वाढला आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली आहे.

आज पुण्यातील शिरूर याठिकाणी सर्वात कमी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ पाषाण 11.6, हवेली 11.7 आणि माळीण येथेही 11.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर वडगाव शेरी याठिकाणी किमान तापमानानं 20 अंशाचा आकडा पार केला आहे. येथील किमान तापमान 20.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. यासोबतच राज्यात नांदेडात 15.1, परभणी 15.1, पुणे 12.5, सातारा 15.5, जळगाव 15, मालेगाव 14.6, नाशिक 12.2, चिखलठाणा 13.4, बारामती 12.8 आणि जेऊन येथे 13 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदलं आहे.

याचबरोबर, विदर्भात देखी सुर्याने ओकायला सुरुवात केली आहे. आज अकोल्यातील कमाल तापमान 35.3 अंशावर पोहोचलं आहे. उर्वरित विदर्भात देखील सर्वत्र कमाल तापमान 32 अंशाच्या वर गेलं आहे. वर्ध्यात कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं आहे. पुढील पाचही दिवस महाराष्ट्रात कोरडं हवामान (Dry weather) राहणार आहे. हवामान विभागानं राज्यात कोणताही इशारा जारी केला नाही. पण तुरळक ठिकाणी तापमान वाढीची शक्यता आहे.

दुसरीकडे, उत्तर भारतात मात्र पावसासह हिमवृष्टीचा (rainfall and snowfall) जोर कायम आहे. येत्या तीन दिवसांत जम्मू काश्मीर, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हिमवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या दिवशी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय 24 फेब्रुवारीनंतर बिहार, झारखंड, ओडीशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *