महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २५ फेब्रुवारी । नोव्हेंबर महिन्यापासून वर्तविण्यात आलेली रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर गुरुवारी खरी ठरली. रशियाने युक्रेनवर चौफेर हल्ले केले. त्यात पहिल्या दिवशी ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाले. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे भारताने यासंदर्भात सावध भूमिका घेतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यामध्ये फोनवरुन सर्व घडामोडींबद्दल गुरुवारी रात्री उशीरा चर्चा झाल्याची माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री फोनवरुन रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली, असं या फोनवरील चर्चेसंदर्भातील माहिती देणाऱ्या पत्रकारच्या पहिल्या परिच्छेदात म्हटलंय. यावेळी पुतिन यांनी सध्या घडलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी, ‘रशियाचे ‘नाटो’शी असलेले मतभेद चर्चेतूनच सोडविता येऊ शकतात,’ या भूमिकेचा पुनरूच्चार करून हिंसाचार थांबविण्याचे आवाहन पुतिन यांना केल्याचं मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.