![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. हे दरवर्षीचे चित्र असले तरी गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रमाण कमी झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे शिवाय नियमातही शिथीलता आहे त्यामुळे पुन्हा गरिबांचा फ्रीज असलेला माठ अमरावती बाजारपेठेत दाखल झाला आहे. नेमकी परस्थिती काय ओढावते म्हणून यंदा दरात वाढ करण्यात आली नाही. तर मातीचे माठ हे 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किंमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे.
रंगबेरंगी माठांना बाजारपेठा फुलल्या: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगबेरंगी माठ शहरात दाखल झाले आहेत. माठामध्ये देखील बदल करुन त्यास तोटी, झाकण हे वेगळे बनवून ग्राहकांना आकर्षित करतेल असे माठ उपलब्ध आहेत. सर्वसामान्य ग्राहकांनाही परवडेल असे माठ उपलब्ध आहेत. १०० रुपयांपासून ते ७००रुपयांपर्यंतचे माठ ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. यंदा सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
माठातील पाण्याची चवच न्यारी: उन्हाळ्यात थंड पाण्याची मागणी असते पण फ्रीज मधल्या पाण्यात ती चव नाही ती मातीच्या माठातील पाण्याला आहे. त्यामुळे घरी फ्रीड असूनही नागरिकांकडून माठाची खरेदी ही होतेच. गेल्या काही दिवसांपासून दाखल झालेल्या मातीच्या माठाला अधिकची मागणी आहे.
ग्राहकांची गर्दी: फेब्रुवारीच्या अंतिम टप्प्यात उन्हाची तीव्रता ही वाढत आहे. त्यामुळे कमी किंमतीमध्ये उपलब्ध असलेल्या माठाला अधिकचे महत्व आले आहे. मागणी अशीच राहिली तर भविष्यात दर वाढतील असेही संकेत विक्रेत्यांनी दिले आहेत.