महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । भारतीय फलंदाजांनी पहिल्या कसोटीत तुफान फटकेबाजी करत श्रीलंकन गोलंदाजांची धुलाई केली. रविंद्र जाडेजाच्या नाबाद १७५, रिषभ पंतच्या ९६, रविचंद्रन अश्विनच्या ६१ आणि हनुमा विहारीच्या ५८ धावांच्या बळावर भारताने ८ बाद ५७४ धावांवर डाव घोषित केला. श्रीलंकन गोलंदाजांची तुफान धुलाई केल्याने भारतीय गोलंदाजांचं कौतुकच झालं पण या दरम्यान सोशल मीडीयावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्यावर काही नेटकरी टीका करताना दिसून आले. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) प्रमाणेच रविंद्र जाडेजालाही द्रविडमुळेच द्विशतकापासून वंचित राहावं लागलं अशा आशयाच्या भावना व्यक्त करत लोकांनी द्रविडवर संताप व्यक्त केला.
काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर मैदानात खेळत असताना राहुल द्रविड कर्णधार होता. त्यावेळी सचिन १९४ धावांवर खेळत असताना राहुल द्रविडने संघाचा डाव घोषित केला होता. त्या मुद्द्यावरून द्रविडवर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर आज श्रीलंकेविरूद्ध २२८ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकार खेचत १७५ धावा करणाऱ्या जाडेजालाही डाव घोषित करत द्रविडने माघारी बोलवलं. यामुळे नेटकरी द्रविडवर भलतेच संतापल्याचं दिसून आलं.
दरम्यान, भारतीय संघाचे वरच्या फळीतील खेळाडू थोडेसे स्वस्तात बाद झाले. रोहित शर्मा (२९), मयंक अग्रवाल (३३), विराट कोहली (४४), श्रेयस अय्यर (२७) आणि हनुमा विहारी (५८) हे मोठी खेळी करू शकले नाहीत. त्यानंतर रिषभ पंतने ९६ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या दिवशीच्या खेळात जाडेजाने नाबाद १७५ आणि अश्विनने ६१ धावा कुटल्या.