महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ मार्च । पुणे-बंगळूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होणार आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, खटाव व सांगली जिल्ह्यातील खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातून हा महामार्ग जाणार आहे. सांगली ते पेठ या महामार्गाचे काम तीन-चार महिन्यांत सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीत केली.
येथील नेमिनाथनगरमधील मैदानावर आयोेजित कार्यक्रमात ‘बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) ते वाटंबरे’ राष्ट्रीय महामार्ग व सांगोला – सोनंद – जत या मार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे झाले. पालकमंत्री जयंत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खा. संजय पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार अनिलराव बाबर, अरुण लाड, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विक्रमसिंह सावंत, सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर प्रमुख पाहुणे होते.
गडकरी म्हणाले, पुणे-बंगळूर या नवीन महामार्गाची लांबी 699 कि. मी. असणार आहे. सध्याच्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी 775 कि. मी. आहे. नवीन महामार्गाची अलाईन्मेंट पक्की झाली आहे. पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील मागासलेल्या भागातून हा महामार्ग जाणार आहे. 40 हजार कोटींचा हा महामार्ग आहे. पुण्याच्या रिंगरोडला जोडणार असल्याने हा ‘मुंबई-बंगळूर’ महामार्ग होणार आहे. कर्नाटकमधील बेळगाव, बागलकोट, गदग, बेल्लारी, दावणगिरी, चित्रदुर्ग आणि पुढे बंगळूरपर्यंत हा महामार्ग जाणार आहे.