महाराष्ट्र 24; ऑनलाईन ; मुंबई; पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात येणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात अनेक जत्रा, उत्सवांचं आयोजन रद्द करण्यात आलं. तसंच सर्वांनी ते करावं, असंही ते यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. आपल्याकडे रोज मार्केट उघडी असतानाही गर्दी का होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला. अनेक ठिकाणी अशा गोष्टींवर मर्यादा आहेत. पण आपण जास्तीत जास्त वेळ बाजार उघडा ठेवतो आहोत. बाजारात गेलात तरी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. अनेकांना घरात राहून मानसिक अस्वस्थता जाणवत असेल याची मला कल्पना आहे. आज आपल्याला बाहेर पडण्याची ओढ आहे. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी घरून काम करा. याच गोष्टी आपल्याला संकटातून बाहेर नेतील, असंही त्यांनी नमूद केलं.