महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । एप्रिल महीन्यात तापमानवाढ 120 वर्षातील उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज स्कायमेट संस्थेने वर्तविलाय. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाने उच्चांक गाठलाय. विदर्भ, मराठवाड्यात पारा कधीच चाळीशी पार गेलाय. मार्चमध्ये देखील १२२ वर्षांचा उच्चांक यंदाच्या उन्हाळ्यात नोंदवला गेला.
उत्तर भारतातही आता उन्हाचा चटका बसतोय. हवामान शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार यंदा एप्रिल महीन्यातील उन्हाळ्यात १२० वर्षातील रेकॉर्डच मोडला जाईल अशी शक्यता आहे. खासगी हवामान विषयक एजन्सी स्कायमेटचे प्रमुख शास्त्रज्ञ जीपी शर्मा, यांनी दिलेल्या माहीतीनुसार १ ते १९ एप्रिल पर्यंत दिल्लीच्या सफदरजंगचं तापमान ३६ अंश सेल्सिअस पर्यंतच होत, पण यानंतर ते वाढत जाईल. सरासरी २-३ अंशने तापमानवाढ नोंदवली जाईल असंही शर्मांनी सांगितलंय. महाराष्ट्रात देखील उंच्चाकी तापमानवाढ नोंदवली जाण्याची शक्यता आहे. उत्तरेतील पंजाब, हरियाणा तसेच राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एप्रिलमधील उन्हाच्या झळा तीव्र होणार आहेत..
मार्च महीन्याच्या अखेरीस अकोल्यामध्ये उच्चांकी ४२.९अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर १९ एप्रिलला राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला, वर्धा आणि चंद्रपूरमध्ये नोंदवलं गेलं. अकोल्यात कमाल ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तसचं वर्धा ४४.८, अमरावती ४३.४, चंद्रपूर ४४.८ ,ब्रम्हपूरी ४४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर मराठवाड्यात परभणी ४३.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय.