महाराष्ट्र २४- ऑनलाईन – जिनिव्हा : जगभरात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. एकूण मृतांची संख्या आता एक लाखांहून अधिक झाली आहे. अशा परिस्थितीत भारतासह जगातील सर्व देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. दरम्यान काही देशांमध्ये हे निर्बंध हटविण्याबाबत विचार केला जात आहे. भारतातही 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंध हटविण्याबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
WHOचे महासंचालक टेड्रॉस अॅडॅनॉम घेब्रेयसिस यांनी लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करण्याआधी होणाऱ्या परिणामांचा विचार करा. लॉकडाऊन हटवल्यास कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा दिला. आफ्रिकेतील काही देश लॉकडाऊन हटविण्याबाबत विचार करत आहेत. या देशांना सावध करण्यासाठी टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
भारतात कोरोना झपाट्याने वाढत आहे. ओडिशा आणि पंजाब या राज्यांनी याधीच लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. दोन्ही राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.