महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ मे । महावितरणने आपल्या वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम म्हणून दोन महिन्यांच्या वीज बिलाएवढी रक्कम भरण्याबाबत बिले दिली आहेत. मात्र सदरची अनामत रक्कम प्री-पेड वीज मीटरधारकांनी भरण्याची गरज नसल्याचे आवाहन महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केले आहे. तसेच ज्या ग्राहकांनी सुरक्षा ठेव रक्कम भरणे आवश्यक आहे, त्यांनाही ती एकरकमी न भरता समान सहा हप्त्यांमध्ये भरता येईल, असेही ग्राहक संघटनेने स्पष्ट केले आहे.
महावितरणचे राज्यभरात सुमारे अडीच कोटी वीज ग्राहक असून महावितरणने वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार ग्राहकांच्या वाढीव वीज वापराच्या प्रमाणात अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याबाबत बिले दिली आहेत. सुरुवातीला सदरची वीज बिले एकरकमी भरावीत असे स्पष्ट केले होते. मात्र वीज आयोगाने सदरची सुरक्षा ठेव रक्कम सहा हप्त्यांमध्ये भरण्याची तरतूद केल्याचे ग्राहक संघटनेने निदर्शनास आणून देताच महावितरणनेही ग्राहकांना सहा हप्त्यांमध्ये सुरक्षा ठेव भरता येईल असे म्हटले आहे. त्यानंतर आता ज्या वीज ग्राहकांकडे प्री-पेड मीटर आहे, म्हणजे वीज वापरण्याआधी जे ग्राहक वीज बिल भरतात, त्यांनी अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कम भरू नये. तसेच ज्या ग्राहकांनी अशी रक्कम भरली आहे, त्यांनी आपली रक्कम परत मिळवण्यासाठी महावितरणकडे अर्ज करावा, असे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने स्पष्ट केले आहे.
सध्या जे ग्राहक वीज वापरल्यानंतर महिन्याच्या शेवटी बिल भरतात, त्यांनी वीज आयोगाच्या नियमानुसार सुरक्षा ठेव रक्कम भरणे बंधनकारक आहे. मात्र त्याच ग्राहकाने भविष्यात प्रीपेड वीज मीटरचा पर्याय निवडल्यास त्याला याआधी भरलेली सुरक्षा ठेव रक्कम परत मिळवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी संबंधिताला महावितरणकडे अर्ज करावा लागणार आहे.