महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ मे । बदलत्या काळानुसार काळाकडे पाहण्याची पद्धतही बदलत आहे. भारतातील मोठी लोकसंख्या आता जुन्या अॅनालॉग किंवा मेकॅनिकल घड्याळाऐवजी स्मार्ट घड्याळाला प्राधान्य देत आहे. त्यामुळे स्मार्ट घड्याळे वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या मार्च तिमाहीत देशात स्मार्ट घड्याळ वापरणाऱ्यांची संख्या अडीच पटीने वाढली आहे. रिसर्च फर्म काउंटर पॉइंटच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी-मार्च तिमाहीत भारतातील स्मार्ट घड्याळांची बाजारपेठ वार्षिक आधारावर १७३% वाढली आहे. विशेष म्हणजे यात नॉइझ, बोट, फायर बोल्ट या भारतीय कंपन्यांचा दबदबा आहे. ५००० रुपयांपर्यंतची स्मार्ट घड्याळे खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षीच्या मार्च तिमाहीत ७८ टक्क्यांच्या तुलनेत ८७% पर्यंत वाढली आहे.