महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१६ जून । गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याकडूनही ‘मान्सून आला रे’ अशी भाकितं दिली जात असली तरीही प्रत्यक्षात मात्र पावसाची वाट अडल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी पावसाच्या सरींनी मात्र दडी मारली आहे. ज्यामुळे आता शेतकऱ्यांनीही चिंता व्यक्त केली आहे.
मान्सूननं सध्या निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, दोन-तीन दिवसांत त्याची विदर्भात प्रगती होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. मात्र पुढील सुमारे पाच दिवस राज्यात काही भागांतच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणात मात्र काही भागांत 18 जूनपासून पाऊस जोर धरेल. जूनच्या अखेपर्यंत दक्षिण, उत्तर कोकणासह मराठवाडय़ातील काही भाग, विदर्भातील बहुतांश भागांत पावसाची सरासरी कमी राहील.
स्कायमेट हवामानानुसार, आज दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, हरियाणा, राजस्थान, दक्षिण भारतातील विविध राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. गुजरातच्या काही भागात वादळ आणि पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीरच्या काही भागात आजही पावसाची शक्यता आहे.
दिल्ली आणि त्याच्या लगतच्या एनसीआर भागात रात्री ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसाने तापमानाचा पारा खाली आणला.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, पश्चिमी विक्षोभ आणि पूर्वेकडील वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. दिल्ली एनसीआरमध्ये मान्सूनपूर्व हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, मान्सूनही दार ठोठावू शकतो, त्यामुळे आता पारा चढण्याची शक्यता कमी आहे.