‘वडील चोरायला निघाले’ टीकेला मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “त्यांच्या आशीर्वादामुळेच हे…”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जुलै । निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. प्रवक्ते संजय राऊत यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला विद्यमान मुख्यमंत्र्यांनी काही तासांमध्येच उत्तर देताना, बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते ते आमच्या वडिलांसारखेच होते असं म्हटलं.

वडील चोरण्याचं वक्तव्य करत उद्धव यांनी केलेल्या टीकेवरुन शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे हे बंडखोरांसाठी वडिलांप्रमाणेच असल्याचं म्हटलं. “मला या बाबतीत कोणावरही टीका करायची नाही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय.
त्या विचारांना आम्ही पुढे नेतोय हे महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून येऊन लोक समर्थन देत आहेत,” असं शिंदे म्हणाले.

“आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची जी भूमिका घेतलेली आहे ती राज्याला पुढं घेऊन जाईन, एवढेच मी या प्रसंगी सांगतो बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. शिवसेनेकडे ते कुटुंब म्हणून पाहत होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे कुटुंबप्रमुख या नात्याने पाहतोय. बाळासाहेब एक महापुरुष होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झालेलं आहे,” असंही शिंदे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *