महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । भाजपचे माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख राजन तेली यांनी केसरकरांना आवरा, असा इशाराच दिला होता. राणे समर्रथकांनी केसरांवर निशाणा साधायला सुरुवात केलेली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अडचण येते की काय? अशी चर्चा सुरु झाली होती. पण या वादात दीपक केसरकर यांनी माघार घेतली आहे. केरसरकारांनी पत्रकार परिषद घेवून आपण यापुढे राणेंविषयी विधान करणार नाही, असं विधान केलं आहे.
दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
“मी काल जे मुद्दे उपस्थित केले होते त्या मुद्द्यांना बगल दिला जात आहे. उद्धव ठाकरेंकडून आरोप करण्यात आला की, माझ्या कुटुंबावर जेव्हा आरोप झाले तेव्हा तुम्ही गप्प बसले होते, असं ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या त्याच विधानाला मी उत्तर दिलं होतं. आम्ही गप्प बसलो नव्हतो. देशाच्या सर्वोच्च नेत्याकडे याबाबत तक्रारही केली होती”, असं स्पष्टीकरण केसरकारांनी दिलं.
“माझा आणि नारायण राणे यांचा वाद झाला होता हे सर्वश्रूत आहे. पण प्रत्येक घटनेचा संबंध त्याच्याशी जोडणं चुकीचं आहे. मी त्यावेळी त्यांच्या अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे. अनेकवेळेला मी सांगितलं आहे की राणेंसोबत माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याची वेळ आली तर मी निश्चितपणे तयार आहे”, असं दीपक केसरकर म्हणाले.
“मी शरद पवारांच्या संदर्भात वक्तव्य करणं चुकीचं आहे, त्यामुळे मी त्यांचं नाव घेवून काहीच बोलत नाही. त्यांच्याबद्दल बोललो की वाईट बोललो, असं होतं. तसंच आता नारायण राणे यांच्याबद्दल बोललो की माझा त्यांच्यासोबत आधी झालेल्या वादाशी संबंध जोडला जातो. त्यामुळे यापुढच्या काळात मी नारायण राणे यांचं नाव घेणार नाही. विषयानुरुप बोललं पाहिजे. माझ्या मुद्द्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”, अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली.