महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । 30 जूनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदाची शपथ घेतली, यानंतर 39 दिवसांनी 9 ऑगस्टला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या विस्तारामध्ये भाजपचे 9 आणि शिंदे गटाच्या 9 अशा एकूण 18 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजूनही खातेवाटप झालेलं नाही, तसंच पालकमंत्र्यांचीही घोषणा झालेली नाही.
पालकमंत्र्यांची (Gaurdian Minister) घोषणा झालेली नसल्यामुळे स्वातंत्र्य दिनाला (Independecne Day) जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. पण आता सरकारने 35 जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण कोण करेल, याची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांपैकी 19 जिल्ह्यांमध्ये शपथ घेतलेले मंत्री 15 ऑगस्टला ध्वजारोहण करतील, याशिवाय उरलेल्या जिल्ह्यांमध्ये तिथले जिल्हाधिकारी ध्वजारोहण करणार आहेत.
ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी जाहीर केल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला आणि पालकमंत्र्यांच्या घोषणेला वेळ लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 17 ऑगस्टपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाआधी सरकारला खातेवाटप करावं लागेल, अन्यथा विरोधक सरकारला धारेवर धरतील हे मात्र निश्चित आहे.