महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबई-पुण्यासह नागपूर तसेच विदर्भात शिवसेनेला पर्याय उभा करण्यासाठी मोठा विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. याकरिता स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे १३ सप्टेंबरला नागपूर येथे असल्याचे समजते. शिवसेनेला फोडल्यानंतर त्यांचा मतदार सहजासहजी भाजपला मते देणार नाही. त्याला पर्याय म्हणून राज ठाकरे यांची सेना उभी केली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये मनसेचा बऱ्यापैकी दबदबा आहे. नाशिक महापालिकेत मनसेची सत्तासुद्धा होती. मात्र विदर्भाकडे सुरुवातीपासूनच मनसेचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. पक्षही रसातळाला गेला. विदर्भात शिवसेनेची व्होट बँक असल्याने ती आपल्याकडे वळवण्यासाठी पुन्हा एकदा मनसेला उभारी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
याकरिता वर्षानुवर्षांपासून चिकटून असलेल्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांची गच्छंती केली जाणार असून काही आक्रमक तसेच ॲक्टिव्ह कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी सोपविली जाणार आहे. नाराज होऊन बाहेर पडलेल्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनाही पुन्हा बोलावले जात असून याकरिता एक चमू कामाला लावण्यात आली आहे.