सातारा- महाराष्ट्र 24 । सातारा तालुक्यातील वडूथ बाजार पेठेत मोठ्या प्रमाणात किराणा व भाजीपाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. त्यामुळे संभाव्य कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी वडूथ गावात मंगळवार पासून 28 ते 30 एप्रिल दरम्यान 3 दिवसांचा जनता कर्फ्यू राबवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. त्यासाठी पोलीस व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दक्षता कमिटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थ व कोरोना कमिटी यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढाकार घेतला आहे.
सध्या कोरोना व्हायरसने जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वडूथ गाव व परिसरात दिनांक 28 ते 30 एप्रिल दरम्यान कडकडीत बंद (जनता कर्फ्यू) पाळण्यात येणार आहे. सातारा तालुक्यातील वडूथ हे गाव बाजारपेठेचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी बाजार तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परगावच्या ग्रामस्थांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दर दिवशी सुमारे 150 ते 200 ग्रामस्थ भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात. सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता वडूथ येथील ग्रामस्थ व कोरोना कमिटीने हा बंदचा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वडूथ येथील बाजार पेठेत नुकतीच एका महिलेला मास्क न लावल्यामुळे महिला पोलीसाने लाठीमार केला. या महिलेला पोलिसांनी समज न देता कारवाई केल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.