महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । गेल्या काही दिवसापासून पावसाने (Rain) विश्रांती घेतली आहे. आता पुन्हा पुढील पाच दिवस मुसळधार बरसणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यामध्ये ईशान्येतील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूरसह काही राज्यांचा समावेश आहे.
पुढील ५ दिवसात नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पावसाची (Rain) शक्यता वर्तवली आहे. १ ते ४ सप्टेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेश आणि २ ते ४ सप्टेंबर दरम्यान आसाम आणि मेघालयात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे.
बिहारमध्ये ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील ५ दिवसांत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर ३० ऑगस्ट रोजी तेलंगणाच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान किनारपट्टी आणि अंतर्गत कर्नाटक, १ आणि २ सप्टेंबरला लक्षद्वीप आणि तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
बेंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालये मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. मुसळधार पावसामुळे सोमवारी बंगळुरूच्या अनेक भागात पाणी साचले होते आणि अनेक झाडे उन्मळून पडली होती. मुसळधार पावसामुळे मंगळवारी बेंगळुरूमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.