महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । कॉमेडियन राजू श्रीवास्तव गेल्या 23 दिवसांपासून दिल्लीतील एम्समध्ये दाखल आहेत. त्यांच्या तब्येतीत चढ-उतार सुरूच आहेत. राजू श्रीवास्तव यांना पुन्हा ताप आला होता. हा ताप जवळजवळ 100 डिग्री इतका होता. डॉक्टरांनी सध्या राजू श्रीवास्तव यांचा व्हेंटिलेटर न काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना पुन्हा ताप भरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान राजू श्रीवास्तव यांच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजन लेव्हल सामान्य आहे.
राजू श्रीवास्तव सध्या शुद्धीवर आहेत. पण राजूच्या हात-पायांची हालचाल थोडी वाढली होती.राजू श्रीवास्तव यांना मंगळवारी थोड्या वेळासाठी व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं होतं. ते 80-90% स्वतः नैसर्गिक ऑक्सिजन घेत आहेत.
जिममध्ये वर्कआउट करताना हृदय विकाराचा झटका आल्याने प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तब्बल 15 दिवसानंतरनंतर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले होते. परंतु अजूनही ते रुग्णलयातच आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून कोमात असल्याने आणि न काही खाल्ल्याने त्यांना प्रचंड अशक्तपणा आल्याचं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं होतं. त्यामुळेच शुद्ध आल्यानंतर त्यांना फारसं काही बोलता आलं नव्हतं. त्यांनी केवळ 5 सेकंदासाठी डोळे उघडले होते. यावेळी ते आपल्या पत्नीशी बोलले होते.
दरम्यान, राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा श्रीवास्तवने नुकतंच त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. अंतराने सोशल मीडियावर हेल्थ अपडेट देत खास अपील केली होती. अंतराने सांगितलं होतं, ‘आता आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यात सकारात्मक बदल होत आहेत. परंतु अजूनही ते व्हेंटिलेटरवरच आहेत. अंतराने लोकांना आवाहन केलं होतं की, कोणत्याही सोशल मीडिया किंवा इतर बातम्यांवर विश्वास ठेऊ नका. तुम्ही फक्त एम्स किंवा राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत सोशल मीडियावर विश्वास ठेवा’.