महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर । यंदा मान्सूनच्या आगमन लवकर होणार अशी चर्चा सुरू होती मात्र मान्सून जुलै महिन्यात सुरू झाला. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने मान्सून परतीच्या मार्गावर असल्याचे चर्चा होती परंतु मान्सून यंदा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. (Monsoon Update) मान्सूनचा वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाचा मुहूर्त यंदा देखील लांबणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस राजस्थानातून मान्सून परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी मान्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते मात्र यंदा उशीर होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
परतीसाठी पोषक हवामान तयार झाल्याने यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राजस्थानात मान्सून माघारी फिरण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र वायव्य भारतात पाऊस सुरू राहण्यासाठी पोषक प्रणाली तयार झाल्या असल्याने सर्वसाधारण वेळेच्या आधी मॉन्सून वायव्य भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता धुसर झाली आहे. आता सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस मान्सून परतीच्या प्रवासाला निघण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
मॉन्सूनच्या राजस्थानातून माघारीची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख १ सप्टेंबर होती. मात्र २०२० मध्ये मॉन्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. राजस्थानातून मॉन्सूनचा प्रवास अद्यापही सुरू झालेला नाही. गतवर्षी ६ ऑक्टोबर रोजी राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू केलेला मॉन्सून २५ ऑक्टोबर रोजी देशातून परतल्याने दक्षिण भारतात ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
राज्यात यंदाच्या पावसाळ्याच्या हंगामात आतापर्यंत (16 सप्टेंबर) 1,149 मिमी पाऊस पडला आहे. राज्याची पावसाची सरासरी 916.6 असून, सध्या सरासरीपेक्षा अधिक 25 टक्के पाऊस पडला आहे. दरम्यान, मागील वर्षी पावसाळ्याच्या हंगामात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात 1,194.3 मिमी पाऊस पडला. अर्थात, या चार महिन्यांतील राज्याची पावसाची सरासरी 1004.2 एवढी असून, सरासरीपेक्षा सुमारे 19 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद हवामान विभागात झाली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर महिना संपण्यास सुमारे चौदा दिवस बाकी असतानाच चार महिन्यांची सरासरी पार करण्यास 87 मिमी पाऊस कमी आहे. राज्यात मान्सून वेळेवर पोहचला. त्यामुळे यंदा चांगलाच पाऊस बरसेल, असे वाटले होते. मात्र, मान्सून पोहचून देखील जून महिना पूर्ण कोरडा गेला. त्यामुळे शेतकर्यांसह नागरिकांची चिंता वाढली होती.