महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२ ऑक्टोबर । पुण्यातल्या वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणारा चांदणी चौकातला पूल अखेर रात्री 1 वाजून 7 मिनिटांनी जमीनदोस्त झाला. स्फोटानंतर पुलाजवळ काही वेळ केवळ धुळीचे लोटच दिसत होते. हळूहळू धुळीचे लोट खाली बसले आणि चांदणी चौकातला पूल पडल्याचं चित्र समोर आलं. गेले अनेक दिवस पूल पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. पुलाला 1 हजार 300 छिद्र पाडून 600 किलो स्फोटकं भरण्यात आली होती. पूल पडल्यानंतर त्याचा मलबा उचलण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
पुल पाडल्यानंतर आता ढिगारा उचलण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, पुढच्या 20 मिनिटांमद्धे सगळा ढिगारा साफ होईल अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे. शेवटचे 10 ट्रक डेब्री शिल्लक आहे त्यामुळे लवकरात लवकर हा मार्ग सुरू होईल अशी माहिती देशमुख यांनी दिली आहे.
वाहनचालक पर्यायी मार्ग देखील वापरू शकतात. सकाळी आठ वाजता वाहतूक सुरू होईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं मात्र अद्याप वाहतूक सुरू झालेली नाही. पुल पाडल्यानंतर इथला मलबा उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. टीपर, पोकलेन मशीन अनेक यंत्रसामग्रीने राडारोडा उचलण्याचे काम सुरू आहे.