महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । आज शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत होणार आहेत. एकनाथ शिंदे गटाचा बीकेसी मैदानावर तर उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे. तर पक्षाची ही अवस्था पाहून मला वाईट वाटत असून उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असती तर ही वेळ आली नसती असं वक्तव्य रामदास कदम म्हणाले आहेत. तर बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी माझ्या आवाजाची तोफ बंद केली असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
“बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्षापूर्वी ही प्रथा सुरू केली होती. त्यावेळी एक पक्ष, एक मैदान एक झेंडा अशी भूमिका होती. पण आज शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळत आहेत. पण हे सगळे एकाच पक्षाचे आहेत. पक्षावर ही वेळ का आली हा प्रश्न मला आहे. आम्ही ५२ वर्षे पक्षासाठी काम केलं. पण पक्षाची आजची स्थिती पाहून मला दु:ख वाटत आहे. उद्धव ठाकरेंनी त्यावेळी दोन पावले माघार घेतली असती तर पक्षावर ही वेळ आली नसती” असं रामदास कदम म्हणाले आहेत.
बाळासाहेबांच्या निधनानंतर दसरा मेळाव्यात माझ्या भाषणावर बंदी घालण्यात आली. फक्त शिवाजी पार्कच नाही तर सगळीकडील माझे भाषणे बंद करण्यात आले, याचे कारणं मलाही माहिती नाहीत असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
मी सर्व आमदारांना गुवाहटीतून मातोश्रीवर आणायला तयार होतो पण शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे राष्ट्रवादीली सोडायला तयार नव्हते, ते मातोश्रीवरून बाहेर निघायला तयार नव्हते आणि आता कसे बाहेर पडले? तर गद्दार कोण हे तुम्हीच ठरवलं पाहिजे असं ते म्हणाले.