चंद्रकांत खैरेंची माघार : नाना पटोले प्रचंड संतापताच व्यक्त केली दिलगिरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ नोव्हेंबर । देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडलेत, असा दावा उद्धवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी दुपारी केला. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले संतापताच दाव्यावरून माघार घेत दिलगिरीही व्यक्त केली. खरी शिवसेना कोणाची यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांचे काही प्रतिनिधी दोन्ही गटांच्या नेत्यांशी संपर्क साधून हा विषय चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात खैरे यांनी असा दावा केला आहे की, न्यायालयाच्या आदेशाने शिंदेसेनेचे सोळा आमदार अपात्र ठरतील. त्यामुळे सरकार पडू नये म्हणून देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत.

या २२ आमदारांच्या बळावर भाजपचा मुख्यमंत्री कसा करायचा याची तयारी आमचे जुने मित्र फडणवीसांनी करून ठेवलीय. काँग्रेसची मोठी भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे ते शांत राहिले आहेत. खैरेंच्या या वक्तव्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचंड संतापले. ज्यांचा स्वत:चा पक्ष फुटला आहे, अशा लोकांनी आमच्याबद्दल बोलू नये, असे त्यांनी ठणकावले. तर सतेज पाटील यांनी खैरेंनी वक्तव्य मागे घ्यावे, असे आदेशच दिले. त्यावर खैरे यांनी कोणाची मने दुखावली असतील, तर दिलगिरी व्यक्त करत वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *