‘पाठीत खंजीर खुपसल्याचा आम्ही बदला घेतला’ ; उद्धव ठाकरेंनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले “हा दृष्टीहीन धृतराष्ट्र…”

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । राज्यात शिवसेना-भाजपाची युती तुटल्यापासून दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपावर मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन न पाळल्याचा आरोप केला असून दुसरीकडे भाजपा मात्र असं कोणतंही आश्वासन दिलं नसल्याचा दावा करत आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं असून पाठीत खंजीर खुपसला असल्याचं म्हटलं आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्रीपदाचं कुठलंही आश्वासन दिलेलं नसताना शिवसेनेने २०१९ मध्ये माझ्या आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याचा बदला आम्ही घेतला, अशी कबुलीच देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.‘उद्धव ठाकरेंनी माझ्या आणि भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. आम्ही पुन्हा येण्याची संधी शोधतच होतो. आम्ही इकडे तपश्चर्या करण्यासाठी आणि साधू संत होण्यासाठी आलेलो नाही. आम्ही राजकीय नेते आहोत. आमच्यासोबत झालेल्या बेईमानीचे उत्तर आम्ही देणारच,” असं फडणवीस म्हणाले.

“एकनाथ शिंदेंना जशी वागणूक मिळत होती, त्यामुळेच त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कोण बाहेर पडत असेल तर आम्ही नको, तुम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत बसा, असं सांगणार नाही. बाहेर पडलात, फार छान, आम्हालाही बदला घ्यायचा आहे, आम्ही असंच म्हणणार ना. मला या गोष्टीचा आनंद आहे. जी बेईमानी माझ्यासोबत झाली होती, त्याचा बदला घेतला,’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

फडणवीसांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर पोहोचल्या होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लक्ष्य केलं.फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रात फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे.

“कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं मिळाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असतील तर ही मतं त्यांना मिळाली असती. “नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

“शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे,” असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंनी आपल्या वक्तव्यावर दिलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *